तीन वर्षांपूर्वी पुण्यात प्रवेश करताना मी जेवढी अस्वस्थ होते तेवढीच अस्वस्थ आज आहे. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. एस.पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, अँडमिशन झाल. तोपर्यंत सगळ ठीक होत. पण जेव्हा प्रत्यक्षात पुण्यात रहायची वेळ आली तेव्हा हा साताऱ्याचा पक्षी गांगारुन गेला. घरच्यांनपासून, मैत्रिणींनपासून दूर जायच आणि मुख्य म्हणजे सातारा सोडायचा या विचारांनी भीतीने पोटात खड्डा पडला. चार दिवस अन्न-पाणी जाईना. खूप विचार करून एस.पी मधल अँडमिशन कँन्सल कराव आणि परत सातारा गाठावा असा आततायीपणाचा निर्णय मी घेतला. सगळ्यांनी समजवून पाहिल. पण मी माझा हेका सोडायला तयार नव्हते.
शेवटच्या क्षणी आत्मपरीक्षण करताना मला जाणवल. जर मी आज माघार घेतली तर पुन्हा कधीच माझ्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडू शकणार नाही. आत्मविश्वास गमावून बसेन. बस्स झाल... आत्ता फार विचार न करता पाण्यात उडी मारलीच आहे तर पळपुटेपणा न करता ताठ मानेन किनारा गाठावा अस मी ठरवल. पहिले कित्येक दिवस पुण्यातला प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता मला सातारचा भास घडवून आणत होता. पहिले काही दिवस मी मनानी कधी पुण्यात पोहचलेच नव्हते. मी स्वतःच्याच मनाची समजूत घालायचे 'धीर धर असेच निघून जातील हे तीन वर्ष...'
पण हळूहळू या पुण्यातील एस.पी च्या दुनियादारीत हा सातारचा पक्षी रूळू लागला. खरोखरच हे तीन वर्ष कसे गेले कळलच नाही. एस.पी नी मला काय दिल या प्रश्नच उत्तर शब्दात मांडण कठीण आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास, विचारांमधील सकारात्मकता, आशावाद, सतत नाविन्याची भूक आणि अश्या कितीतरी गोष्टींचे कित्ते एस.पी च्या तालमीत आम्ही गिरवले. अहिरे सर आणि शेंडे सरांनसारख्या शिक्षकांनी अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या नगरीतून आम्हाला सफर घडवून आणली. इतिहास अभ्यास मंडळातला प्रवास अविस्मरणीय होता. गेल्या तीन वर्षात इतिहास विभागामध्ये केलेले कार्यक्रम म्हणजे अनुभवांची शिदोरीच म्हणावी लागेल. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर सोबत राहणारेत असे असे मैत्रीचे "उनाड" बंध या कॉलेजमध्येच जोडले गेले. कळत-नकळत अनेक गोष्टी कॉलेजने तसेच पुण्याने देखील शिकवल्या. आज निरोप घेताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर या आठवणींच्या वलयातील अनुभव उपयोगी पडतीलच.
अगदी काल परवा सुरू झालेला हा प्रवास आज अचानक थांबतोय... एका नव्या प्रवासासाठी... तेव्हा मला रॉबर्ट फ्रास्ट या अमेरिकन कवीची सुप्रसिद्ध कविता खूप प्रकर्षाने आठवते..
हे समोरच दृश्य खूप मोहक आहे.
इथंच रेंगाळावस वाटत.
पण मी नियतीला वचन दिल आहे.
अजून खूप प्रवास बाकी आहे...
खूप प्रवास बाकी आहे.....
- मुक्ताफळ
(कु.मुक्ता भारत शिंदे.)