Tuesday 13 October 2020

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

           काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं वाटलेल. पण पुढे भलताच काही वाढून ठेवलेलं. कदाचित उंदीर, घुशींनी लॉकडाऊनचा काळ आमच्या ड्रेनेज पाइपमध्ये मस्त एन्जॉय केला होता. मस्तपैकी हातभार पाइप खाऊन त्यामध्ये छोटे दगड- गोटे, वाळू भरून त्यांनी बाथरूम आणि चेम्बर यांचा संपर्कच तोडून टाकला होता. एवढ्यावरच ते शांत बसले नाहीत तर त्यांनी किचन सिंक मध्ये सुद्धा त्यांनी हाच पराक्रम गाजवला होता.त्यांच्या चुका पोटात घेण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नव्हता. या ड्रेनेजच्या गोंधळात मी फ्लॅशबॅक मध्ये गेले. कारण ड्रेनेज हा काय आधुनिक मानवाने लावलेला शोध नाही. तर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी आजच्या स्मार्ट सिटीला टक्कर देतील अशी संस्कृती, नगररचना अस्तित्वात होती. या नगररचनेतील अनेक प्रमुख वैशिष्ट्यंपैकी एक म्हणजे सांडपाणी व पाऊसाचे पाणी शहराबाहेर वाहून नेहण्यासाठी एक मीटर खोल भुयारी गटारांची केलेली निर्मिती. हि गटारे दगड आणि पक्क्या विटांनी बांधलेली होती. हडप्पन लोकांना चांगलेच ठाऊक होते कि अश्या नाले, गटारी उघडे ठेऊ नयेत. संपूर्ण ड्रेनेज सिस्टीम, नाले विटा आणि दगडांनी झाकून ठेवण्यात आले होते. आणि तपासणीसाठी नियमित अंतराने तपासणी सापळे तयार करण्यात आले होते. हे सर्व आठवण्याचं निम्मित असं.. कि,काही दिवसांपूर्वीच या संस्कृतीतल्या एका शहराला प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मला मिळाली. 
            मी पहाटे चार वाजताच उठले. कारण आम्हाला जवळपास ५००किमी प्रवास करायचा होता. आजपर्यंत मी ज्या जागेबद्दल केवळ पुस्तकातून शिकत होते. त्याला प्रत्यक्षात भेट देण्यासाठी मी कमालीची उत्सुक होते. पण या हडप्पन शहराला भेट देतानाच रस्त्यातील "मोधेराच सूर्य मंदिर" आणि जागतिक वारसा स्थळ असलेली "राणी की वाव" आम्हाला साद घालत होती. पुष्पावती नदीच्या काठावर वसलेले मेहसना जिल्यातील मोढेराचे सूर्य मंदिर हे गुजरातमधील मंदिर वास्तूकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर सोलंकी राजा भीमदेव प्रथमच्या कारकिर्दीत बांधले गेले. या जागेचा उल्लेख स्कंद पुराणात भास्कर प्रदेश असा आहे. हे मंदिर तीन विभक्त घटकांचे एकत्रीकरण आहे. ते म्हणजे गुधामंडप (मुख्य मंदिर), सभा मंडप आणि कुंड (जलाशय). मंडपाच्या बाह्य भाग आणि स्तंभांना अतिशय कोरीव काम करून सुशोभित केले आहे. कुंडाच्या पायथ्याशी पायऱ्या आहेत. आणि काही छोटी मंदिरेही आहेत. सभामंडपात ५२ स्तंभ आहेत. या स्तंभांवर वेगवेगळ्या देवी-देवतांची शिल्पे आहेत. त्याव्यतिरिक्त आतील बाजूस रामायण आणि महाभारतातील प्रसंगांना उत्कृष्ट कारागिरी करून दर्शवण्यात आले आहे. या स्तंभांना खालच्या दिशेने बघितल्यास ते अष्टकोनी दिसतात तर वरच्या बाजूने बघितल्यास गोलाकार दिसतात. सभामंडपानंतर गुधमंडप व गर्भगृह आहे. जेथे सूर्यदेवाच्या बारा प्रतिमा रेखाटल्या आहेत. गुधमंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराल आहे. गर्भगृहामध्ये कोणतीही प्रतिमा स्थापन केलेली नाही. मोधेराच्या सूर्य मंदिरामध्ये ब्रह्मा, शेषशायी विष्णू, विष्णूचे विभिन्न अवतार त्यामध्ये वराह, त्रिविक्रम, नरसिंह इत्यादी. काही शिल्पे शैव पंथाचे प्रतिनिधित्व करणारी आहेत, त्यामध्ये उमा महेश्वर, नृत्य करणारा गणेश तसेच दुर्गा आणि सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या बाहेरील भिंतींवर आदित्य, अष्टदिक्पालचे फलक, गौरीची विभिन्न रूपे,नृत्य करणाऱ्या अप्सरा, वाद्य वाजवणारे अशी अनेक शिल्पे रेखाटली आहेत. चालुक्यन शैलीतील मोढेराचे सूर्य मंदिर स्थापत्यशैलीचा आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
            मोधेरा सूर्य मंदिरापासून जवळच "राणी की वाव" हे जागतिक वारसा स्थळ आहे. पाटण गावातील सरस्वती नदीच्या काठावर वसलेली ही पायऱ्यांची विहीर पाण्याचे महत्व अधोरेखित करणारी स्थापत्य कलेचे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. ही पायऱ्यांची विहीर सातमजल्यांमध्ये विभागली गेली असून त्यामध्ये ५० हुन अधिक मुख्य शिल्पे असून एक हजार हुन अधिक लहान धार्मिक व पौराणिक प्रतिमा आहेत. या विहिरीचे बांधकाम सौराष्ट्राच्या खनगाराची मुलगी व ११व्या शतकातील सोलंकी घराण्याची राणी म्हणजेच भीम पहिला याची पत्नी "उद्यमती" हिने केले. पुढे नजीकच्या काळात शेजारील सरस्वती नदीमुळे हि विहीर पाण्याखाली गेली होती. १८९० मध्ये हेन्री कउन्स आणि जेम्स बर्गेस यांनी या जागेला भेट दिली तेव्हा हि विहीर पाण्याखाली गाडलेली होती. १९८६ ला ASI ने (Archaeological Survey of India) या ठिकाणी मोठे उत्खलन केले व या विहिरीचा जीर्णोद्धार केला. या उत्खलनात त्यांना राणी उद्यमतीची प्रतिमा देखील मिळाली आहे. या विहरीची रचना जमिनीखालील मंदिर अशी आहे. यातील शिल्पांमध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव, देवी, गणेश, कुबेर,लकुलीशा, भैरव, सूर्य, इंद्र यांच्यासह अनेक हिंदू देवतांचे चित्रण आहे. विष्णूची चोवीस रूपे तसेच विष्णूचे दशावतार यांचाहि त्यात समावेश आहे. ब्रह्मा- सावित्री, उमा- महेश्वर आणि लक्ष्मी- नारायण या देवतांची शिल्पे येथे आहेत. अन्य उल्लेखनीय शिल्पांमध्ये अर्धनिश्वर तसेच लक्ष्मी, पार्वती,सरस्वती, चामुंडा, दुर्गा, वीस हात असलेली महिषासुरमर्दिनी क्षेंमकरी, सूर्यनी आणि सप्तमातृका यांची शिल्पे मोठ्या संख्येने आहेत. नऊ ग्रहांच्या प्रतिमा देखील येथे आढळतात. येथे मोठ्या संख्येने अप्सरांची शिल्पे आहेत. ती कामुक हेतू दर्शवतात. स्त्रियांच्या दैनंदिन जीवनाचे दर्शन घडवणारी काही शिल्पे आहेत. त्यांच्यात विविध प्रकारच्या भावभावना चित्रित केल्या आहेत. याशिवाय विहरीत खांबांना सजावट म्हणून घोडे, हत्ती, सिंह या प्राण्यांच्या आकृतीचा वापर केला आहे. भिंतींना भौमितीय जाळीचे नमुने आणि पटोला वस्त्रोद्योगासारखी सजावट केली आहे. या शिल्पांमधील बारकावे पाहताना आपण खरोखरच त्यामध्ये रमून जातो.
               आता आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला निघालो. ज्याच्यासाठी इतका सारा घाट घातला होता. आम्हाला अजूनही जवळपास सहा- साडेसहा तासांचा प्रवास करायचा होता. "कच्छ" पांढऱ्या वाळवंटासाठी म्हणजेच मिठाच्या वाळवंटासाठी प्रसिद्ध असलेल. तसेच येथील हस्तकलेतून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंना देखील अख्या भारतातून मागणी असते. आम्ही कच्छमधल्या रापर गावात जेवण केल. नॉनव्हेज खाणाऱ्या माणसाला गुजरातमधील जेवणाशी जुळून घ्याव लागत. असो. आम्ही आता खादीर बेटावर प्रवेश केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला पांढरा शुभ्र मिठाचा सडा.. त्या नयनरम्य दृश्याचा आम्ही मनापासून आनंद घेत होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रन ऑफ कच्छचा तलाव भरलेला होता. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे ज्याचे लोभस रूप असते त्या "फ्लेमिंगो" पक्षांचे थवेच्या थवे आम्हाला रन ऑफ कच्छच्या तलावात दिसले. पाण्यामधल्या त्याच्या शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद होत्या. दिवसभराच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशन पॉईंटला पोहचलो. 
              "धोलावीरा" आजच्या घडीला कच्छच्या वाळवंटाकडे एक कोरडवाहू प्रदेश म्हणून पाहिलं जात. पण सुमारे ४५०० वर्षांपूर्वी येथे १२०० वर्षे एक संपन्न महानगर अस्तित्वात होते. सिंधू संस्कृतीतल्या लोकांनी वाळवंटात एका आधुनिक शहराची निर्मिती केली. धोलाविरा त्या लोकांसाठी खूप महत्त्वाचं होतं. कारण, या शहरानं पुढे आंतरराष्ट्रीय बंदराची भूमिका बजावली. त्यावेळेची भॊगोलोक परिस्थिती आजपेक्षा नक्कीच वेगळी होती. पण कच्छच्या वाळवंटी प्रदेशाला आणि हवामानाला धोलावीरातील नागरिकांनी अत्यंत चातुर्याने हाताळले होते. या जागेचा शोध १९६७-६८ मध्ये प्रा.जे.पी.जोशी यांनी लावला होता. ज्याप्रदेशातील काही महिने, वर्षे पाऊसाविना असतात त्या खादिर बेटावरील धोलावीरा शहर मात्र पाणीच नव्हे तर सर्वच बाबतीत सुफळ संपूर्ण होत.
               या शहराचे प्रमुख आधारस्तंभ म्हणजे उत्तरेला असणारा मानसर कालवा आणि आणि दक्षिणेला असणारा मनहार कालवा होय. धोलावीराच वैशिष्टय म्हणजे जलवाहिन्या व जलाशयांची अत्याधुनिक जलसंधारण व्यवस्था ज्याच संपूर्ण बांधकाम हे दगडांच आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात जलाशय होते. त्यातील तीन भाग उघडकीस आले आहेत. ते पाऊसाने आणलेले गोडे पाणी साठवण्यासाठी किंव्हा जवळील दोन कालव्यावरून वळवलेल्या पाण्याचा साठा करण्यासाठी वापरले जात होते. सांडपाणी वाहून नेहण्यासाठी दगडी नाले बनवण्यात आले होते. उपलब्द पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली विस्तीर्ण पाणी व्यवस्थापन प्रणाली हवामानातील जलद बदलांच्या विरोधात टिकून राहण्यासाठी लोकांनी योजलेले उपाय दाखवते. पाण्याच्या साठवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या दगडांच्या विहिरी हे देखील डोलावीराचे एक वैशिष्ट्य आहे. शहरातील किल्या (Citadel) मध्ये सर्वात लक्षवेधक दगडांची विहीर सापडली आहे. धोलावीराच्या विस्तृत जलसंधारणाच्या पद्धती अद्वितीय आहेत. आणि प्राचीन जगाच्या सर्वात कार्यक्षम प्रणालींपैकी एक आहेत.
              इतर हडप्पन शहरे पक्क्या विटांनी बांधली गेली आहेत. मात्र धोलावीराचे वैशिष्ट्य म्हणजे ते चौरस आणि आयताकृती दगडांनी बांधले गेले होते. जे दगड जवळच्याच खाणीतून उपलब्द होत होते. धोलावीरा शहर मातीच्या विटांनी बांधलेल्या बाह्य तटबंदीने बंदिस्त होते त्यावर होते दगडी बुरुज आणि दोन प्रमुख उत्तर व दक्षिणेकडील भिंतींच्या मध्यभागी प्रवेशद्वार. धोलावीरा तत्कालीन शहराचे वेगवेगळे भाग ओळखले गेले आहेत. त्यामध्ये एक छोटासा वाडा परिसर होता. त्याच्या पश्चिमेस बेली परिसर होता आणि उत्तरेस मोठे मधले शहर (Middle Town) व पूर्वेला खालचे शहर (Lower Town) या सर्वांच्या स्वतःच्या बंदिस्त भिंती होत्या. धोलावीराच मधले शहर हे ३६०×२५० मी भिंतींनी वेढलेले होते. शहराचा मधला भाग आणि सिटॅडल हा संरक्षण कार्य, अंगभूत क्षेत्र, रस्ता व्यवस्था, विहिरी आणि मोठ्या मोकळ्या जागेसह सुसज्ज होता. शहरातील सिटॅडल हे संपूर्णपणे तटबंदीचे आणि गुंतागुंतीचे क्षेत्र होते. शहरातील भव्य किल्लेवजा वाडा हा दुहेरी तटबंदीने संरक्षित होता. शहरातील महत्वाचे लोक बेली परिसरात राहत. किल्ला-बेली आणि मधल्या शहरादरम्यान एक मोठा खुला परिसर आहे त्याची ओळख स्टेडियम अशी झाली आहे. जे कदाचित विशिष्ठ औपचारिक प्रसंगी वापरले गेले असेल. खालच्या शहरात काही घरांचे अवशेष सापडतात. सोबतच त्याठिकाणी मणी, शिंपले, मातीची भांडी घडवणारे यासारखे यासारख्या हस्तकला उदयोगांचे अवशेष सापडतात. 
                 शहराच्या बाहेरील भागात स्मशानभूमीचे अवशेष दिसतात. धोलाविरामध्ये एक विशाल वर्तुळाकार रचना मिळाली आहे. हि रचना म्हणजेच एखादी कबर किंव्हा स्मारक असल्याचे मानले जाते. परंतू याठिकाणी कोणतेही मानवी सांगाडे किंव्हा इतर अवशेष मिळाले नाहीत. या रचनेत दहा रेडियल चिखल-विटांच्या भिंती आहेत ज्या एका स्पोकल व्हीलच्या आकारात बांधल्या आहेत. धोलावीरा शहरातील सर्वात महत्वाचा शोध म्हणजे उत्तरेच्या प्रवेशद्वारा शेजारील एका खोली मध्ये सापडलेला साइनबोर्ड होय. दहा चिन्हे असलेला हा साइनबोर्ड एका लाकडी फळीवर लिहलेला आहे. त्यावरील चिन्हे जिप्सम खनिजापासून तयार केली आहेत. त्यातील लाकूड कुजले आहे मात्र त्यावरील चिन्हे अजूनही सुस्थितीत आहेत.धोलावीराच्या उत्खननातून मिळालेल्या अनेक वस्तू येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत. संग्रहालयात प्रवेश करतानाच आपल्याला धोलावीरा साइनबोर्डची तयार केलेली प्रतिमा दिसून येते. उत्खननात सापडलेली खापराच्या भांडी, चौकोनी मातीचे शिक्के, स्तंभिका, बांगड्या, मातीपासून बनवलेल्या प्राण्यांच्या मूर्ती, जीवाष्म, मातीचे केक, चाके, वजन मोजमापे आणि दगडी हत्यारे अश्या अनेक वस्तूंचे संकलन या संग्रहालयात केले आहे. तांब्यापासून बनवलेली अंगठी, दागिने आणि बाण देखील आपल्याला पहायला मिळतात.
                     एखाद्या गोष्टीचा आपण खूप आटापिटा करतो आणि जेव्हा फायनली ती गोष्ट आपल्यासमोर येते,आपण तिचा आनंद घेत असतो तेव्हा झर्रकन डोळ्यासमोरून ती मिळवण्यासाठी केलेला खटाटोप आठवतो. सातारा ते धोलावीरा हजार मैलाचा प्रवास.. किती सुखद अनुभव दिले मला या प्रवासानी... त्याचीच उजळणी करता आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. 
                                                                                                                              - मुक्ताफळ

                                                                                                                        (कु. मुक्ता भारत शिंदे.)
मोधेराच सूर्य मंदिर  


राणी की वाव 



उत्तरेचे प्रवेशद्वार धोलावीरा 


पूर्वेचे प्रवेशद्वार धोलावीरा 



ढोलाविराच्या उत्तरेकडील गेटवरील ढोलाविरा साइनबोर्ड 



पायऱ्या असणारा जलसाठा धोलावीरा

Monday 9 March 2020

सुरवात नव्या पर्वाची...!

                         खूप प्रवास बाकी आहे असं म्हणत स.प.महाविद्यलयाचा निरोप घेतला होता.डेक्कन कॉलेजला ऍडमिशन मिळालं आणि या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. Archaeology ला आल्यानंतर सुरवातीला हे सगळं मला झेपेल का नाही असं वाटत होत.नवीन विषय आणि सभोतालच्या वातावरणामुळे मी काहीशी भांबावून गेले होते. पण लवकरच या मध्ये रमले सुद्धा... कोणत्याही Archaeologist साठी एखाद्या site ला भेट देणे यातील आनंद काही औरच असतो.काही दिवसांपूर्वीच हा आनंद मी प्रत्यक्ष अनुभवला. सुट्टीच निम्मित साधून आम्ही मैत्रिणींनी उस्मानाबाद मधील तेर गावाला भेट देण्याचा बेत आखला.
                         फक्त प्लॅन ठरवून शांत न बसता.त्याच रात्री उस्मानाबादला निघायचं ठरवलं.एका दिवसात ट्रेनच बुकिंग मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे एस.टी महामंडळाचा पर्याय स्वीकारला. रात्री साडे दहाच्या बसच बुकिंग केलं जेणेकरून आम्ही रात्रीचा प्रवास करून पहाटे पर्यंत उस्मानाबादला पोहचू.मी आणि माझ्या उत्साही मैत्रिणी साडे दहा वाजता शिवाजीनगरला पोहचलो. अर्धा तास झाला तरी बस काही येईना म्हंटल्यावर काहीतरी गडबड असल्याचं आमच्या लक्षात आलं. चौकशी केंद्रावर चौकशी केल्यानंतर सगळा घोळ लक्षात आला. आम्ही ज्या गाडीची साडे दहा वाजल्यापासून वाट पाहत होतो. ती गाडी साडे दहा वाजता पनवेलहुन सुटणार होती. म्हणजेच तिला पुण्यात पोहचायला एक- दीड वाजणार होता. अरेरे... म्हणजे तब्बल दोन- अडीच तास गाडीची वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्याकडे नव्हता. आमच्या सळसळत्या उत्साहावर एव्हाना विरजण पडल होत. पण शांत बसू ते आम्ही Archaeologist कसले..! Archaeology मधले प्रश्न आणि उत्तरे हा आमचा खेळ सुरु झाला. प्रवासात असावीत म्हणून घेतलेली चिप्सची पाकीट पुण्यातच उघडली गेली होती. हसत खिदळत दोन- अडीच तास निघून गेले. साधारण दीड वाजता आमची बस आली आणि पुणे- उस्मानाबाद प्रवासाला सुरवात झाली. इतक्यावेळ ताटकळ पडल्यामुळे आम्ही सगळेच पेंगाळलेले होतो.गप्पांचा पूर मात्र अजूनही ओसरलेला नव्हता. पण आजूबाजूच्या जनतेचं भान ठेवत आम्ही झोपण्याचा निर्णय घेतला. साडे सहा वाजता आम्ही उस्मानाबादला पोहचलो. जवळच्याच एका लॉजमध्ये आवराआवरी करून आमची स्वारी आता उस्मानाबाद ते तेर या प्रवासासाठी सज्ज झाली. पुन्हा लालपरीच्या मदतीने आम्ही तेर पर्यंत पोहचलो.आता सर्वप्रथम पेटपूजा करावी यावर आमचं एक मत झालं.
            उस्मानाबादपासून १८ किमी वर वसलेल्या तेर गावाला शेकडो वर्षांपासूनचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 'पेरिप्लस ऑफ इथेरियन सी' या प्रवासवर्णनात बॅरिगाझा (गुजरातमधील भरूच) पासून २० दिवसांच्या प्रवासाने पैठण येते. पैठणपासून पूर्वेस दहा दिवस प्रवास केल्यानंतर तगरला पोहचता येते असं सांगितलं आहे. हे प्राचीन तगर म्हणजेच आजच्या काळातील तेर होय. तेर गाव पांढऱ्या मातीच्या टेकाडावर वसलेले आहे. तेरणा नदीच्या दोन्ही बाजूला अनेक पांढरीची टेकाडे आपल्या उदरात पूर्वजांच्या वैभवशाली वारशाच्या पाऊलखुणा सामावून स्थित आहेत. महार, कोट,मुलांनी,रेणुका,बैराग, सुलेमान,काझी,गोदावरी या टेकड्या आजही तेरच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात.पुरातत्वज्ञ एखादी विशिष्ट जागा उत्खलनासाठी कशी निवडतात असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. आज जश्या अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरज आहेत.



त्याच प्रमाणे प्राचीनकाळी पाणी ही मानवाची अत्यंत महत्वाची गरज होती. ज्याठिकाणी पाण्याची उपलब्द्ता असे अश्या ठिकाणी मानव वस्ती करून राहत असे. प्राचीन काळी बहुतांश घरेही मातीने बांधली जात. अश्या वस्त्या एकावर एक झाल्याने कालांतराने वस्त्यांच्या पडझडीमुळे त्या अवशेषांचे एक पांढरीचे टेकाड निर्माण होते. शेतातील काळ्या व इतर करड्या मातीपेक्षा या पांढरीच्या टेकाडाच्या रंग वेगळा असतो. पांढरीचे टेकाड याचाच अर्थ प्राचीन वस्तीचे अवशेष असलेले टेकाड होय. या तेरच्या उदरात इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातील पुरावशेष दडलेले आहेत. तेर मध्ये पुरातत्व खात्याची आत्ता पर्यंत आठ उत्खलने झालेली आहेत. प्राचीन काळात तगरला उपराजधानीचा दर्जा होता. ज्याप्रमाणे प्रतिष्ठान (पैठण) हे सातवाहनांच्या काळात भरभराटीला आले होते त्याचप्रमाणे तेर देखील सातवाहनांच्या काळात दक्षिणपथावरील प्रमुख व्यापार केंद्र बनलेले होते.तेर येथील उत्खलनात सर्वात खालच्या थरात सापडलेल्या गुळगुळीत दगडी हत्यारावरून येथील नवषमयुगात देखील मानवी वस्ती होती असा अंदाज बांधता येतो. (इ.स.पु.९५००-९०००). बौद्ध वाङ्मयात उल्लेखलेल्या षोडस महाजनपदांपैकी अश्मक व मूलक ही जनपदे मराठवाड्यात होती. त्यापैकी तगरचे स्थान अश्मक जानपद होते.(इ.स.पु.६००). तगरचा सर्वात प्राचीन उल्लेख सांची स्तूपावरील कोरीव लेखात 'ताकारपद' असा आढळतो. मौर्यकालीन (इ.स.पु.3००-2००) नाणी व NBP उत्खलनात सापडल्यामुळे मौर्याकालीन तगरची भूमिका स्पष्ट होते.
                            या सर्व कालखंडामध्ये सातवाहन कालीन तेरचा पुरातत्वीय वारसा महत्वाचा ठरतो. टॉलेमी या ग्रीक ग्रंथकाराने दक्षिणेतील कापड उत्पादनातील प्रमुख केंद्र म्हणून तगरचा उल्लेख केलेला आहे. तेर मध्ये सापडलेले मद्यकुंभ, जाती,दिवे,नाणी,रेड पोलिश वेअर व अन्य अवशेष वरून तेर व रोम यांचे घनिष्ट संबंध होते असे स्प्ष्ट होते. इ.स.१९५८ च्या उत्खलनात सापडलेल्या नाण्यावर 'सातकणीस' ही ब्राह्मी अक्षरे आढळून येतात. तर इ.स.१९६७-६८ च्या उत्खलनात वशिष्टीपुत्र पुळुमावीचे नाणे सापडलेले आहे. त्याचप्रमाणे १९८६ मध्ये सापडलेल्या ब्राह्मी शिलालेखावर वाशिष्टीपुत्र या सातवाहन राजाचा उल्लेख स्पष्टपणे दिसून येतो.या शिलालेखात वशिष्टीपुत्र पुळुमावी याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीचा उल्लेख आहे. तेर येथील त्रिविक्रम मंदिरात सापडलेली कार्तिकेची अप्रतिम मूर्ती राष्ट्रकूटकालीन असल्याचे सिद्ध होते.शिलाहार घराण्याच्या तीन प्रमुख शाखांपैकी उत्तर कोकण व कोल्हापूर ही दोन घराणी आपले पूर्वज प्रारंभी तगर नामक सुंदर नगरात राज्य करीत होते असे अभिमानाने दर्शवतात.यादव राजा रामराजाची नाणी देखील तेर मध्ये सापडली आहेत. यादवकाळात होऊन गेलेले संत गोरोबा काका यांचे गाव तेरच..! म्हणूनच आज तेरला गोरा कुंभाराचे तेर म्हणून देखील ओळखले जाते. इ.स १४ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश जिंकून घेतला. त्यानंतर तेर वर बहामनी, निजामशाही, आदिलशाही आणि औरंगजेबाने राज्य केले.म्हणजेच प्राचीन काळापासून आजपर्यंत इतिहासाचे कालखंड बदलले मात्र तेर चे महत्व अबाधितच राहिल्याचे दिसून येते.
                        आम्ही तेरणेची परिक्रमा करून तेर गाव पहिले.आजही तेर मध्ये सातवाहनकालीन खापराचे तुकडे सर्रास पाहिला मिळतात.सातवाहनकालीन भाजक्या विटांनी बांधलेला स्तूप आम्ही पाहिला. येथील त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. पुरातत्वखात्याने स्तूप व मंदिरांचे केलेले संवर्धन कौतुकास्पद आहे.येथील रामलिंगाप्पा लामतुरे या संग्रहालयाला आम्ही भेट दिली. तेरच्या वैभवशाली इतिहासाचे संवर्धन या संग्रहालयात केले आहे. उत्खलनात सापडलेल्या विविध वस्तूंचे जतन या संग्रहालयात करून ठेवले आहे. या संग्रहालयाच्या मागच्या बाजूलाच बांधकामामध्ये मौर्यकालीन विहिर सापडलेली आहे. एव्हाना आत्ता सूर्य डोक्यावर आला होता.त्याने आम्हाला पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांची जाणीव करून दिली. आत्ता मस्त पैकी गावरान जेवणावर ताव मारायचा असा बेत प्रत्येकजण मनातल्या मनात आखत होत.पण त्यादिवशी महाशिवरात्री असल्याने आम्हाला जेवण कुठे मिळेना. शेवटी एका हॉटेलमध्ये नाष्टा मिळाला आणि पोटातले कावळे शांत झाले. दुपारनंतर आम्ही तेरचा निरोप घेऊन पुन्हा उस्मानाबाद गाठले.उस्मानाबाद ला पोहचे पर्यंत चार वाजले होते.आमचे परतीची ट्रेन साडे अकराची होती.त्यामुळे अजून आमच्या हातात वेळ शिल्लक होता.
                      उस्मानाबाद शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या धाराशिव लेण्यांना भेट देण्याचं आम्ही ठरवलं. या लेण्या निर्मनुष्य असल्यामुळे जायचं कस हा प्रश्न होता.कसाबसा एक रिक्षावाला तयार झाला. त्यालाही रस्ता नेमका माहित नसल्याने आम्हाला चुकीच्या पत्यावर सोडून तो पसार झाला. पण आम्ही हार मानायला तयार नव्हतो. शेवटी मिळेल त्या गाडीला हात करून आम्ही धाराशिव पर्यंत पोहचलोच. साधारण पाचव्या ते सातव्या शतकातील या लेण्या आहेत. या मध्ये एकूण सात लेण्या असून त्या पाहताना आपण हरखून जातो. या लेण्या मूळच्या बुद्धिस्ट असून नंतर त्या जैन धर्मामध्ये रूपांतरित झाल्या असे मानले जाते.या लेण्यांमध्ये महावीर स्वामी व पार्श्वनाथ यांच्या मूर्ती रेखाटलेल्या आहेत. यातील दोन क्रमांकाची लेणी सर्वात मोठी असून ती अजिंठा लेण्याशी मिळतीजुळती आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. दिवसभर केलेल्या धावपळीनंतर निरव शांततेचा निशद्बआनंद घेत आम्ही सूर्यास्त पाहिला. आता हळूहळू अंधार गडद होत होता. त्याआधी आम्हाला उस्मानाबादला पोहचायचे होते.आणि त्या माळरानातून पायी जाण्याशिवाय पर्याय नव्हता.आता किर्रर्र अंधार आणि त्या ओसाड माळरानात पायाखाली प्राण्यांचे सांगाडे...! हुश्श.. पोहचलो एकदाच उस्मानाबादला..
                   आम्हाला कडकडून भूक लागली होती.कदाचित रात्री सुद्धा आम्हला नाष्टा करावा लागेल अशी चिन्हे दिसत होती. बहुदा महाशिवरात्रीचा मुहूर्त आम्हाला उपवास घडवणार होता. अथक शोधमोहिमेनंतर कसबस एका हॉटेल मध्ये जेवण मिळालं.आणि तृप्तीचा ढेकर देऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. एक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होत.या सर्व आठवणींचे गाठोडे मनाशी बांधून आमचा परतीचा प्रवास सुरु झाला....
                                                                                                                                    - मुक्ताफळ
                                                                                                                               (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Wednesday 2 October 2019

.....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस.

                   "आमच्या अंगावर पोकळ शब्द फेकून तुम्ही आमची स्वप्न आमचं बालपण हिरावून घेतलंय. आणि तरी सुद्धा मी भाग्यवंतांपैकी एक आहे. कारण लोक त्रस्त आहेत, जीवनमरणाच्या उंबरठ्यावर आहेत, संपूर्ण भवतालच कोसळत चालय. आम्ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत. आणि तुम्ही कश्याच गुणगान गाताय... आर्थिक उलाढाल आणि पैसा..? या परिकथे मध्ये तुम्ही रमताय...! तुमची हिम्मतच कशी होते....??" एका सोळा वर्षाच्या मुलीने असा प्रश्न केल्यामुळे हवामान परिषदेतील नेते निर्रुतर झालेत. 
                     ग्रेटा थनबर्ग राइट लाइव्हलीहूड या पर्यायी नोबेल पुरस्काराची विजेता... गेल्या वर्षी शाळा बुडून स्वीडनच्या संसदेबाहेर "जर भविष्यच नसेल तर शिकायचं कश्यासाठी?" असा आर्त टाहो तिनी फोडला होता. वाढत्या ऊर्जा वापरामुळे वाढत असलेल्या कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय आणि या जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसू लागलेत. ग्रेटाने हवामान बदलाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 
                    आज राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली? विकासाच्या नावाखाली विकसित देशांची पर्यावरणाला घातक असलेली आडमुठी धोरणे, विकसनशील देशांची विकासाबाबतची हाव आणि अविकसित देशांची जीवनावश्यक गरज पूर्ण करताना होणारी घुटमळ.. या सर्वांमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे कुठे तरी थांबायला हवं.. जसा पर्यावरण रक्षणाचा अट्टहास आहे तसा शाश्वत विकास देखील गरजेचा आहे. म्हणजे विकास आणि पर्यावरण निवडताना यापैकी कोणाचा तरी बळी जाणारच... पण हा शाश्वत विकास आपल्याला पर्यावरणाला सोबत घेऊन करता आला तर....! याकरिताच ग्रेटाने " FRIDAY FOR FUTURE " हि मोहीम उघडलीये.तिच्या या मोहिमेला जगभरातून पाठिंबा मिळतोय. ग्रेटाने स्वीडनच्या राजकारण्यांना, “मी माझ्या मनामध्ये जी भीती घेऊन जगतेय ती भीती जेव्हा तुमची झोप उडवेल तेव्हा तुम्ही वातावरणबदलाविरोधात पावले उचलाल. मला तुम्हाला माझ्या मनातील भीतीशी ओळख करून द्यायची आहे.” असं तिने ठणकावून सांगितलं होतं. कोणतीही गोष्ट आधी स्वतः करा मग लोकांना सांगा, या उक्ती प्रमाणे ग्रेटाने याची सुरवात स्वतःच्या घरापासून केलीये. हवामान बदलाच्या परिषदेसाठी पंधरा तासांचा सागरी प्रवास करून ती हजर झाली. दैनंदिन जीवनातील काही सवयी ज्या पर्यावरणाला घातक आहेत त्या कमी करून पर्यावरण वाचवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो हे तिनी दाखून दिलंय.                            
                   महात्मा गांधीनी सांगितलेली ग्रामविकासावर आधारित जीवनशैली यासाठीचा आदर्श आहे. पर्यावरणाच्या सानिध्यातील जीवनशैली आत्मसात करणे ही आजच्या काळाची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जिथे लोकांना आपल्या दोन वेळेच्या जेवणाची चिंता आहे. तिथे पर्यावरणला दुय्यम स्थान मिळाले तर नवल वाटण्याचे कारण नाही. पण उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाला सोबत घेऊन त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचय आपल्याला... यासाठी ग्रेटाने उघडलेली ही मोहीम कौतुकास्पदच आहे. एका सोळा वर्षाच्या मुलीने मोठ्यांनी देखील लहानांकडून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे दाखून दिलंय....म्हणूनच ग्रेटा तू खरोखरच ग्रेट आहेस. 

                                                          -  मुक्ताफळ 
                                                     (कु.मुक्ता भारत शिंदे.)
 

Saturday 20 April 2019

अजून खूप प्रवास बाकी आहे.....

      तीन वर्षांपूर्वी पुण्यात प्रवेश करताना मी जेवढी अस्वस्थ होते तेवढीच अस्वस्थ आज आहे. तीन वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही मला लख्ख आठवतो. एस.पी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, अँडमिशन झाल. तोपर्यंत सगळ ठीक होत. पण जेव्हा प्रत्यक्षात पुण्यात रहायची वेळ आली तेव्हा हा साताऱ्याचा पक्षी गांगारुन गेला. घरच्यांनपासून, मैत्रिणींनपासून दूर जायच आणि मुख्य म्हणजे सातारा सोडायचा या विचारांनी भीतीने पोटात खड्डा पडला. चार दिवस अन्न-पाणी जाईना. खूप विचार करून एस.पी मधल अँडमिशन कँन्सल कराव आणि परत सातारा गाठावा असा आततायीपणाचा निर्णय मी घेतला. सगळ्यांनी समजवून पाहिल. पण मी माझा हेका सोडायला तयार नव्हते.
                   शेवटच्या क्षणी आत्मपरीक्षण करताना मला जाणवल. जर मी आज माघार घेतली तर पुन्हा कधीच माझ्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडू शकणार नाही. आत्मविश्वास गमावून बसेन. बस्स झाल... आत्ता फार विचार न करता पाण्यात उडी मारलीच आहे तर पळपुटेपणा न करता ताठ मानेन किनारा गाठावा अस मी ठरवल. पहिले कित्येक दिवस पुण्यातला प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता मला सातारचा भास घडवून आणत होता. पहिले काही दिवस मी मनानी कधी पुण्यात पोहचलेच नव्हते. मी स्वतःच्याच मनाची समजूत घालायचे 'धीर धर असेच निघून जातील हे तीन वर्ष...'
                    पण हळूहळू या पुण्यातील एस.पी च्या दुनियादारीत हा सातारचा पक्षी रूळू लागला. खरोखरच हे तीन वर्ष कसे गेले कळलच नाही. एस.पी नी मला काय दिल या प्रश्नच उत्तर शब्दात मांडण कठीण आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास, विचारांमधील सकारात्मकता, आशावाद, सतत नाविन्याची भूक आणि अश्या कितीतरी गोष्टींचे कित्ते एस.पी च्या तालमीत आम्ही गिरवले. अहिरे सर आणि शेंडे सरांनसारख्या शिक्षकांनी अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या नगरीतून आम्हाला सफर घडवून आणली. इतिहास अभ्यास मंडळातला प्रवास अविस्मरणीय होता. गेल्या तीन वर्षात इतिहास विभागामध्ये केलेले कार्यक्रम म्हणजे अनुभवांची शिदोरीच म्हणावी लागेल. आणि मुख्य म्हणजे आयुष्यभर सोबत राहणारेत असे असे मैत्रीचे "उनाड" बंध या कॉलेजमध्येच जोडले गेले. कळत-नकळत अनेक गोष्टी कॉलेजने तसेच पुण्याने देखील शिकवल्या. आज निरोप घेताना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्यावर या आठवणींच्या वलयातील अनुभव उपयोगी पडतीलच.
                        अगदी काल परवा सुरू झालेला हा प्रवास आज अचानक थांबतोय... एका नव्या प्रवासासाठी... तेव्हा मला रॉबर्ट फ्रास्ट या अमेरिकन कवीची सुप्रसिद्ध कविता खूप प्रकर्षाने आठवते..

                    हे समोरच दृश्य खूप मोहक आहे.
                          इथंच रेंगाळावस वाटत.
                   पण मी नियतीला वचन दिल आहे.
                      अजून खूप प्रवास बाकी आहे...
                           खूप प्रवास बाकी आहे.....

                                                          - मुक्ताफळ
                                                    (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Friday 19 April 2019

जिज्ञासा

                     हा रविवार जरा वेगळा होता. पण म्हणा सुट्टीत प्रत्येक दिवस हा रविवारच वाटतो. आदल्या दिवशीच कांबिरे मामांनी मला What's up वरून एका इतिहास सहली विषयी कळवल होत. श्री.चंद्रकांत कांबिरे हे नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल, चांगल्या चांगल्या नाटकांबद्दल माहिती देत असतात. या इतिहास सहलीविषयी त्यांनी आवर्जून सांगितल होत त्यामुळे मी ही या सहलीला जाण्यास उत्सुक होते. 'जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था'  यांच्या मार्फत या अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास सहलीचे ठिकाण होते माहुली! आत्ता माहुली म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येते ती स्मशानभूमी...! आत्ता अश्या ठिकाणी कोणता बरं इतिहास असेल याची उत्सुकता होती.
                    साडेतीन वाजता आम्ही माहुली येथील लक्ष्मी मंदिराजवळ जमलो. तिथे श्री.विक्रांत मंडपेसरांनी सर्वांच स्वागत केल. त्यांनी जिज्ञासाच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. गेले २२ वर्ष मंडपेसर व त्यांचे सहकारी जिज्ञासा मार्फत ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम करत आहेत. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला समाधी म्हणजे काय? तसेच मराठाशाहीत समाधी बांधण्याचा उद्देश काय होता हे सांगितल. समाधी बांधण्याचा उद्देश हा इतर लोकांना त्यातून प्रेरणा मिळावी हा होता. तेथे आम्ही २-३ समाध्या बघितल्या पण त्यांची नावे आज कुणालाच सांगता येत नाहीत. कारण या समाध्यांची कोठेही नोंद नाही. हा आपल्या इतिहासातील दुर्लक्षित भागच म्हणावा लागेल.
                     पुढे साताऱ्यातील आघाडीचे कलाकार श्री.सागर गायकवाड यांनी डॉक्युमेंटेशनचा लाईव्ह वॉटर कलरिंग हा प्रकार दाखवला.त्यांनी इतिहास व चित्रकला यांची सुरेख सांगड घालत त्यांनी इतिहासातील चित्रकलेचे महत्व पटवून दिले. नंतर आम्ही संभाजीपुत्र शाहूंच्या लाडक्या कुत्र्याची समाधी बघितली असे म्हणतात, या कुत्र्याने शाहूंना वाघच्या हल्ल्यातून वाचवले होते. त्यामुळे हा अत्यंत नावाजलेला कुत्रा होता. काही ठिकाणी तर हा कुत्रा नवसाला पावण्याचे ही उल्लेख आहेत. नंतर आम्ही ३०० वर्ष जुना असलेला व अजूनही वापरत असलेला रथ पाहिला. मराठाशैलीतील हा रथ अत्यंत अप्रतिम असा आहे. पुढे आम्ही वटवाघळांच झाड पाहिल.मंडपेसरांनी आपल्या ओघवत्या शैलीत या वटवाघळांचा प्रवास सांगितला. रत्नागिरी, दाभोळ, गुहाघर इथल्या फळभागातील फळ खावून ती परत येथेच येतात. मात्र दुर्दैवाने हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
                     नंतर आम्ही सुप्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल काशी विश्वेश्वराच मंदिर पाहिल. काशी विश्वेश्वर मंदिरातील नक्षीकाम खरोखरच अप्रतिम आहे. साधरण १७३५
च्या सुमारास या मंदिराच बांधकाम झालय. या मंदिराची शैली ही यादवशैली असून येथील दीपमाळ खरोखरच देखणी अशी आहे. काशी विश्वेश्वर मंदिरातील बारकावे पाहताना यादवकालीन शैलीची महानता लक्षात येते. पुढे आम्ही महाराणी ताराबाई व थोरल्या शाहूंची समाधी देखील बघितली. या समाध्या १० वर्षापूर्वी नदीखाली गाडल्या गेल्या होत्या. मात्र जिज्ञासा मंचच्या हालचालींमुळे या समाध्या शोधण्यात यश आले.
                   नंतर कृष्णा- वेण्णाच्या संगमावरून हातात हात घालून आम्ही नदी पार केली. या ठिकाणी दबंग बरोबरच अनेक सिनेमांच शूटिंग झालेल आहे. रामेश्वर मंदिरात क्षेत्र माहुलीच्या सरपंचानी सर्वांचे स्वागत केले. सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच हे मंदिर आहे. या मंदिरातील राम व लक्ष्मण यांना मिशा आहेत. व रामाच्या हातात धनुष्यबाण नाही तसेच सीता ही रामाच्या मांडीवर बसलेली आहे. या मूर्तींवरून अस लक्षात येते की, त्या काळातील लोकांची देव हा  आपल्यातीलच एक आहे अशी भावना होती. क्षेत्र माहुलीतील स्थानिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी क्षेत्र माहुलीच्या ऐतिहासिक वारश्याचे सुंदर शब्दात वर्णन केले.
                      त्यानंतर आम्ही राधा- शंकर मंदिराकडे जाण्यास निघालो. वाट खडतर असल्यामुळे आम्ही ऐतिहासिक सहली बरोबरच ट्रेकिंगचीही मज्जा लुटत होतो. पण इथे मला माझा अतीउत्साह नडला आणि लॉंग जंप मारायच्या नादात मी बाभळीच्या काट्यात जाऊन पडले. हातापायात चांगलेच काटे घुसले, जबर मुक्का मार लागल्याने पायही दोन दिवस चांगलच सुजला होता.
                      पुढे मंडपेसरांनी नदी व घाट यांची परंपरा उलघडून सांगितली. खर तर मंडपेसरांच्या आवाजाची ओळख संपूर्ण साताऱ्याला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांना ऐकण्याचा अनुभव खूप मस्त होता. त्यांच्या बोलण्याच्या विशिष्ठ शैलीमुळे त्यांचे बोलणे ऐकतच रहावेसे वाटते. प्रत्यक्ष माहुलीला भेट दिल्यानंतर त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात आले. आज आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात इतके व्यस्त झालो आहोत की, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक वारश्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे.
                       अश्या या इतिहास सहलीचा गोड शेवट बिलेश्वर मंदिरात झाला. नदी ओलांडून परत संगम माहुलीला पोहचेपर्यंत आठ वाजून गेले होते. मात्र त्या काळोखातही 'जिज्ञासा' ने आमच्या सर्वांच्या मनात इतिहासाविषयी पेटवलेला दिवा अजूनच प्रखर होत होता.

(टीप- सदर लेख चार वर्षांपूर्वी लिहलेला आहे. जागतिक वारसा दिनाच्या १८एप्रिल*  निमित्ताने तो ब्लॉगच्या माध्यमातून प्रकाशित करत आहे.)

                                                          - मुक्ताफळ
                                                     (कु.मुक्ता भारत शिंदे.)

Monday 3 September 2018

भिडे वाडा व्हेंटिलेटरवर आहे....!

              सन १८४८ भारतात इंग्रज राजवट सुरू होती. समाज अज्ञान, दारिद्य्र, स्त्री-पुरुष भेदभाव, उच्च-निचता या सारख्या अनेक समस्यांनी ग्रासलेला होता. याकाळात मुलींना शिक्षण घेणे तर दूरच पण माणूस म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार देखील नव्हता.
                 अश्यावेळेस महात्मा जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले या दांपत्याने समाजातील कर्मठ रुढी परंपरांविरुध्द बंड पुकारले. समाजातील ही विषमता नष्ट करायची असेल तर तळागाळातील लोकांपर्यंत विशेषतः स्त्रीयांपर्यंत शिक्षण पोहचवणे आवश्यक आहे हे त्यांनी जाणले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यामधील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची देशातील पाहिली शाळा या दांपत्याने सुरू केली. ही शाळा चालवणे सोपे नव्हते. पुण्यातील कर्मठ सनातनी लोकांनी याला विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी आपले स्त्री शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. भिडे वाड्यात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हा भिडे वाडा स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक क्रांतीचा साक्षीदार झाला. पण आज......
                   ज्या भिडे वाड्या मध्ये मुलींनी पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. तो वाडा आज अखेरची घटका मोजतोय. वाड्याच्या भिंती कोसळण्याच्या मार्गावर आहेत, छत मोडकळीस आलंय, आतमध्ये मातीचे ढिगारे आणि कचऱ्याशिवाय काही नाही. कोणे एकेकाळी येथेच स्त्री शिक्षणाचा इतिहास घडला होता. यावर विश्वास बसत नाही. अश्या या भिडे वाड्याला सरकारकडून देखील दुर्लक्षित करण्यात आलय. वाड्याच्या डागडुजीसाठी निधी मंजूर झाला असला तरी अजून त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. भिडे वाडा हा विद्यमान पालकमंत्री गिरीष बापट यांच्या मतदारसंघात येतो. मात्र सत्तेचा कार्यकाल संपत आला तरी देखील वाड्याच्या नव उभारणी साठी बापटांकडून केवळ आश्वासनांशिवाय कोणतेही काम झाले नाही.
         ऐतिहासिक भिडे वाड्याच्या समोरच प्रसिध्द दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १८९३ ची. त्यावेळेस छोटेखानी असलेल्या या मंदिराचा आत्ता मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्या समोरच असलेला भिडे वाडा मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडतोय. एका बाजूला कथित विद्येची देवता आणि दुसऱ्या बाजूला विद्येचे मूर्तिमंत असलेले स्मारक या दोघांच्या विकासातील विरोधाभास आपण लक्षात घेतला पहिजे.
                   ऐतिहासिक स्थळांच्या बाबतीत आपली असलेली उदासीनता  खेददायक आहे. ऐतिहासिक स्थळांचे,  वास्तूंचे जतन व्हावे व त्यातून सर्वांनीच प्रेरणा घेवून नवनिर्मितीचा ध्यास धरावा. हा दृष्टीकोनच आपण कुठेतरी विसरत चालोय..
               ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असलेला हा भिडे वाडा आज व्हेंटिलेटरवर आहे. या अवस्थेत तो आपल्या सर्वांच्या मदतीची वाट पाहतोय.....
     
                                                        - मुक्ताफळ
                                                   (कु.मुक्ता भारत शिंदे.)  

Thursday 9 August 2018

मन धागा धागा जोडते नवा नवा...


                त्याच आणि माझ सोयरीक कधी जुळलच नव्हतं. त्याची अवेळी येण्याची सवय, वाट पाहिला लावणं आणि मनमानी कारभार यामुळे मी काहीशी खट्टूच होते त्याच्याशी. त्या दिवशी सुद्धा तो नेहमी सारखाच अचानक आला. ( एव्हाना मला आत्ता त्याच्या अवेळी येण्याची सवय झालीये.) त्यादिवशी मात्र मी वैतागलेच जरा. त्याच्या या मस्तीखोरपणामुळे माझ्या पुढच्या प्लानची वाट लागणार होती.
                   त्याच्या अश्या अवेळी येण्यानी सगळ्यांचीच धावपळ उडाली  होती. तो काही एकटा आला नव्हता  नेहमी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, डोळ्याला न दिसणाऱ्या पण स्पर्शाने स्वतः च अस्तित्व दाखवणाऱ्या त्याच्या दोस्ताला घेऊन तो हजर झाला. तो भेटतो असा की काही वेळ जीव गुदमरून जावा आणि नाही भेटत तेव्हा असा की त्याच्या भेटी अभावी जीव कासावीस व्हावा. त्या दिवशी मात्र मी ठरवलं आपणच थोडं समजूतदारपणाने घेऊया. दोन क्षण त्याच्या सोबतीने घालवूया.. त्याच्या सोबत राजारामपुरी मध्ये भटकायचं या कल्पनेने मी रोमांचित झाले. कित्येक वर्षांनंतर त्याच्या सरींना मी मनमोकळेपणाने झेललं होत. त्याच्या बद्दलचा सगळा रुसवा आत्ता विरून गेला होता. चंचल धावणाऱ्या मनाला आणि विचारांना आत्ता विसाव्याची गरज होती. आपोआप पाऊलं हिंदुस्थान बेकारीकडे वळली. वाफळलेल्या कॉफीचे घोट घेताना किती तरी दिवसात जिची भेटच पडत नव्हती ती "शांती" भेटली.
                या अश्या वातावरणात रंकाळा गाठायचा विचार मनात चमकला. मग काय या सुंदर वातावरणातील रंकाळ्याचा नजराणा पाहण्यासाठी स्वारी व्याकुळ झाली. धावतच एका रिक्षावाल्याला गाठलं. वरून "वरूणराजा" बरसतोय, रस्त्यावर लाईट नाही अश्या वेळेस रंकाळ्यावर काय काम असे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. थोडीफार घासाघाशी करून मी त्याला  येण्यासाठी तयार केलं. रंकाळा माझ्या आवडीच ठिकाण.. इथं आल्यावर खूप शांत वाटत. मनातल्या विचारांच्या थैमानाला आवर घालून आपल्या सौंदर्याच्या प्रेमात पाडण्याची कला रंकाळ्यात आहे.
                 आजूबाजूच्या लोकांच भान आत्ता मला नव्हतं. रंकाळ्यानी मला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतल होत आणि मी ही वाहवत गेले...

                            मुक्ताफळ
                    (कु.मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...